राज्यातील चार जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 29 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे, पुणे सातारा सांगली सोलापूरला या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.
तर मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, कोल्हापूर, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला आहे. महाराष्ट्रात ढगफुटी झाली आहे.
बीडच्या आष्टी तालुक्यातील राळसांगवी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे गावातील नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या पुलावरून पाणी जात असल्याने चार गावाचा संपर्क तुटलेला आहे.
पुणे शहरात आज पुन्हा एकदा जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. मागील दोन दिवसांपासून वातावरण ढगाळ असून, आज सलग तिसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावली. सायंकाळनंतर अनेक भागांत मेघगर्जनेसह पावसाच्या सरी पडल्या, त्यामुळे तापमानात घसरण होऊन गारवा निर्माण झाला आहे. पाषाण, औंध, सिंहगड रस्ता, कात्रज, बाणेर, आणि शिवाजीनगर परिसरात पावसाचा जोर अधिक जाणवला.
वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस पुणे जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. वीजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि ताशी ३० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
शिर्डी शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे.
अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. काही भागात विजेच्या कडकडांसह वादळी पाऊस झाला.