पुणे : पैठण तालुक्यातील चिंचोळा गावात दोन पुतण्यांनी जमीनीच्या वादातून आपल्याच चुलत्याची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोघांनाही अटक करण्यात आली आहे. बाबासाहेब सखाराम ब्रह्मराक्षस (३३) आणि आबासाहेब सखाराम ब्रह्मराक्षस (३०) असे दोन आरोपींची नावे आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नामदेव एकनाथराव ब्रह्मराक्षस (वय ६०) असं मृत व्यक्तीचे नाव आहे.मृत नामदेव यांनी काही वर्षांपूर्वी आरोपींच्या वडिलांकडून दीड एकर शेती विकत घेतली होती. मात्र, ती परत देण्यास त्यांनी नकार दिला. या प्रकरणावरून पुतण्यांमध्ये संताप निर्माण झाला होता. त्यांनी काकाचा काटा काढायचं ठरवलं. त्यांनी क्राईम पेट्रोल पाहून खूनाचा कट रचला.९ मे रोजी रात्री झोपेत असलेल्या नामदेव ब्रह्मराक्षस यांना आरोपींनी चोर शिरला आहे असं सांगून जागं केलं.
त्यांना शेतात विहिरीकडे नेण्यात आलं. त्याठिकाणी एका पुतण्याने गळा आवळला आणि दुसऱ्याने कोयत्याने शीर धडापासून वेगळं केलं. त्यानंतर मृतदेह विहिरीत फेकून देण्यात आला. त्यानंतर आज ही घटना उघडकीस आली.
या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच दोघा आरोपींना अटक केली. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.