प हलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर सुमारे 15 दिवसांनी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तानची दाणादाण उडवून दिली. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले करुन 100 हून अधिक दहशतवाद्यांना ठार मारले.
जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा यासारख्या दहशतवादी संघटनांच्या तळांना भारताकडून टार्गेट करण्यात आले. पाकिस्तान भारताला सातत्याने अणुहल्ल्याच्या धमक्या देत असताना भारताने ही कारवाई केली आहे.
दरम्यान, भारत (India) आणि पाकिस्तान दोन्ही न्यूक्लियर पॉवर देश आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून मोठी लष्करी कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पाकिस्तानने अणुहल्ल्याच्या धमक्या देण्यास सुरुवात केली होती. तथापि, भारताने पाकिस्तानला त्याच्याच भाषेत चोख प्रत्युत्तर दिले. अशा परिस्थितीत जर पाकिस्ताननेही भारतावर हल्ला केला आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर पाकिस्तान अणुबॉम्बचा वापर करु शकतो.
रेडिएशनचा सर्वात मोठा धोका
अणुबॉम्ब हे जगातील सर्वात धोकादायक शस्त्र आहे. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने (America) जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकीवर या दोन शहरांवर अणुबॉम्ब टाकून मोठा विध्वंस घडवून आणला होता. या हल्ल्यात जपानमधील हिरोशिमामध्ये काही मिनिटांत सुमारे 80 हजार लोक मृत्युमुखी पडले होते. स्फोटामुळे इतकी उष्णता निर्माण झाली होती की, अनेक लोक या उष्णतेमुळे मरण पावले होते. त्याचवेळी, हल्ल्यानंतर इतके धोकादायक रेडिएशन पसरले की, नंतर यामध्येही अनेक लोकांचा मृत्यू झाला होता. या रेडिएशनचा परिणाम आजही हिरोशिमामध्ये दिसून येतो. तर नागासाकी येथील अणुहल्ल्यानंतर शहराचा 80 टक्के भाग उद्ध्वस्त झाला होता.
रेडिएशनपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे?
जर एखाद्या देशाने अणुहल्ला केला तर संरक्षणासाठी खूप कमी वेळ असतो, कारण स्फोटानंतर उष्णता आणि ऊर्जा निर्माण होते आणि खूप लवकर पसरते. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे त्याचे रेडिएशन अनेक किलोमीटरपर्यंत पसरते. अशा परिस्थितीत, रेडिएशनपासून वाचण्यासाठी पळून जाण्याचा प्रयत्न करु नका, जिथे जागा मिळेल तिथे स्वतःला बंदिस्त करा आणि पुढील 24 तास बाहेर पडू नका. तसेच, तुम्ही घातलेले कपडे ताबडतोब काढून टाका, मात्र ते इतर व्यक्ती आणि प्राण्यांच्या संपर्कात येऊ देऊ नका, कारण कपड्यांवर रेडिएशन राहण्याची शक्यता जास्त असते. यानंतर आंघोळ करा. लक्षात ठेवा की, शरीराला साबणाने जास्त घासू नका. डोळे, नाक आणि कान स्वच्छ कपड्याने साफ करा.