बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येला दोन महिने उलटले आहेत. या घटनेमुळे मराठवाड्यातील राजकारण तापले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सात आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे.
बीडमधील पवनचक्की उद्योजकाकडे खंडणी मागितल्याच्या आरोपावरुन अटकेत असलेले वाल्मिक कराडला मकोका लावण्यात आला आहे. वाल्मिक कराडवर संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाचेही आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. फरार असलेल्या कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता आमदार संदीप क्षीरसागर यांनी यावर मोठे विधान केले आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी मस्साजोग ग्रामस्थांचे अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. आमदार संदीप क्षीरसागर हे देखील आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी त्यांना संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी फरार असलेल्या आरोपी कृष्णा आंधळेबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी थेट भाष्य केले.
…तर 24 तासात तो अटक झाला पाहिजे
“कृष्णा आंधळे जिवंत असता तर पोलिसांना सापडला असता. मी त्या दिवशी सुद्धा बोललो आणि आजही बोललो. एखादा माणूस जिवंत असला तर आणि त्यांची सर्वजण चौकशी करतात आणि तो सापडत नाही. पोलिसांनी ठरवलं तर 24 तासात तो अटक झाला पाहिजे, याचाच अर्थ तो जिवंत नाही”, असे संदीप क्षीरसागर म्हणाले.
“हीच फार वाईट गोष्ट होत आहे या कुटुंबीयांसोबत लहान लेकर आणि वैभवीची उद्या बारावीची परीक्षा आहे. यामध्ये लवकर प्रशासनाने सरकारने दखल घेतली पाहिजे. ज्या वेळेस वाल्मिक कराड हे सर्व जिल्ह्याचा कारभार बघत होते, त्यावेळेस जे काही अधिकारी आणले होते ते त्यांच्या माध्यमातून आणले होते. ज्यावेळेस हा गुन्हा घडला त्यावेळेस हेच अधिकारी सर्व आजूबाजूला तपासात होते. त्यामुळे सीआयडीकडे प्रकरण देण्याच्या आधी त्याच्या चौकशीबद्दल कुटुंबीयांना काही सांगत नाहीत. वाल्मिक कराड शरण होताना ज्यांच्या गाडीमध्ये आले जे डॉक्टर आहेत. आरोपींना पैसे पुरत होते या सगळ्या गोष्टीवरून असं वाटत की त्यांचा सुद्धा गुन्हा झाला पाहिजे”, असे संदीप क्षीरसागर यांनी म्हटले.
सीडीआर जर समोर आले सगळेच विषय समोर येतील
“संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर आणि त्याच्या आधी सुद्धा तेव्हा त्यांनी ॲट्रॉसिटी केली नाही. हत्या झाल्यानंतर सुद्धा वेळ लावला. त्यावेळेस प्रशासन कशामुळे शांत होतं, कोण त्यांना फोन करत होतो, तोपर्यंत ते अटक होत नव्हते, त्यांना कोण मदत करत होतं, त्यावेळेसचे एसपी, डीवायएसपी पोलीस आणि प्रशासन यांचे सीडीआर जर लोकांसमोर आले सगळेच विषय समोर येतील”, असेही संदीप क्षीरसागर म्हणाले.
तरीसुद्धा कारवाई होत नाही
सगळ्यांना वाईट वाटतं, सगळ्यांची मागणी आहे न्याय भेटला पाहिजे, ज्या कालावधीत प्रकरण घडलं होतं ते प्रकरण पुढे वर्ग करताना प्रशासनाकडून यांना काहीच भेटत नाही. कृष्णा आंधळे सापडत नाही मला असं वाटतं तो जिवंत नाही. पोलीस स्टेशनमध्ये बालाजी तांदळे दम दिला आहे, तरीसुद्धा कारवाई होत नाही तपास होत नाही, असेही त्यांनी सांगितले.